8. रट्ठपालाची धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
*************************
8. रट्ठपालाची धम्मदीक्षा
Conversion of Ratthapala
*************************
1) एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरुंची नगरी थुल्लकोठ्ठित येथे तथागत राहिले.
2) कुरुंना हे समजल्यावर तथागतांचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले.
3) ते बसल्यावर तथागतांनी त्यांना धम्मोपदेश केला. तथागतांचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी तथागतांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले.
4) त्यांच्यामधील तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रट्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, "माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही."
5) "मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे ?"
6) ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रट्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला, आणि प्रवज्ज्या व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली.
7) भगवंतांनी विचारले, "असे करण्यास तुला तुझ्या मातापित्याची संमती आहे काय?"
8) "नाही, भगवन्."
9) "ज्यांना त्यांच्या मातापित्यांची सम्मती नाही त्यांना मी संघात प्रवेश देत नाही."
10) "महाराज, ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन." तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंतांचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली.
11) आईवडिलांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले, "बाळा रट्ठपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा; खा, पी, मजा कर, आणि सुखाने सत्कृत्ये करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही."
12) "तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हांला हे जीवन सुखाचे वाटणार नाही; तर आता तू आमच्या जवळ असूनही आम्ही तुला गृहत्याग करून भिक्खू होण्याची संमती का द्यावी?"
13) दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रट्ठपालाने तीच विनंती केली, आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली.
14) आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे, त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि 'एक तर मी येथेच प्राण देईन, नाही तर भिक्खू तरी होईन' असे त्याने स्पष्ट सांगितले.
15) त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवीत त्याचे आई-वडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले, पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा दोनदा-तीनदा विनवणी केली पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही.
16) म्हणून रट्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी आपल्या मुलाला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला पुन्हा सांगण्यास त्यांनी त्या मित्रांना सांगितले.
17) त्याच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली. पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, "तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की, 'मी एक तर मरून जाईन, नाहीतर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही.' पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहाणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या."
18) "ठीक आहे, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे."
19) रट्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही सांगितले.
20) तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो तथागतांकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, "मी भिक्खू होण्याबद्दल आई-वडिलांची संमती मिळविली आहे, मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे."
21) तथागतांच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठ्ठित येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षायात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली.
22) ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करुन गृहहीन भिक्खू होतात तो उच्च प्रतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श, भिक्खू रट्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निःस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला.
23) नंतर तो तथागतांकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, "तथागतांच्या अनुज्ञेने आई-वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे."
24) रट्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे साधारण पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून तथागतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली.
25) तेव्हा उठून अत्यंत आदराने तथागतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चीवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठ्ठित येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली. (deer-park of the Kuru king)
26) दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चीवर वस्त्र परिधान करुन आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलाच्या घरी आला.
27) त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विचरीत होते. त्यांनी रट्टपालास दुरुन येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, "या वैराग्याच्या कारट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खु करुन टाकले."
28) याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रट्ठपालाला काहीही मिळाले नाही; नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या.
29) त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रट्टपाल तिला म्हणाला, "ताई, ते जर टाकून देणार असाल तर ते माझ्या या पात्रात घाला."
30) त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिणीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, "मालकीन बाई, धाकटे मालक परत आले आहेत."
31) "तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस," आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली.
32) कुंपणाजवळ बसून रट्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, "बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस?"
33) "गृहस्था, गृहत्याग करुन गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो. पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या."
34) "ये बाळ, आपण घरात जाऊ."
"नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे," रट्ठपाल म्हणाला.
35 ) "ठीक आहे. पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे."
36) भिक्खु रट्टपालने मौन धारण करुन आपली संमती दिली.
37) नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या-रुप्याच्या लगडी रचून त्यावर गालिचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रट्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले.
38) रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली. आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चीवरे परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रट्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला.
39) नंतर त्या सोन्यारुप्याच्या राशीवरून गालिचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, "हे तुझे मातृधन आहे, ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्ये या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे."
40) "ये बाळ. तुझी श्रमणचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर, सर्व संपत्तीचा आनंदाने उपभोग घे आणि सत्कृत्ये कर."
41) "गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारिरीक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील."
42) भिक्खू रट्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारु लागल्या, "ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा?"
43) तो म्हणाला, "भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही."
44) आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्च्छित होऊन जमिनीवर पडल्या.
45) रट्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, "गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे. मला त्रास देऊ नकोस."
46) "भोजन तयार आहे. बाळ, सुरुवात कर," पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले.
47) भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनांत तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला.
48) आपण पहायला येण्यापूर्वी ते वन नीटनेटके करून ठेवावे अशी कुरु राजाने त्याच्या शिकाऱ्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रट्ठपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की, "वन व्यवस्थित आहे. परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रट्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे."
49) "आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही." राजा म्हणाला, "मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो." असे म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रट्ठपालाला भेटण्यासाठी निघाला.
50) रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यत गेल्यावर राजा आपल्या परिवाराबरोबर पायी चालू लागला आणि रट्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली.
51) "नाही, महाराज. आपण तेथे बसा. माझे हे आसन आहेच."
52) आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, "रट्ठपाल, माणसाला चार हानी भोगाव्या लागतात की, ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढीमिशांचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या चार हानी म्हणजे
(1)म्हातारपण (2)अनारोग्य (3)दारिद्र्य आणि (4)नातलगांचा मृत्यू ह्या होत."
53) "समजा, एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे. वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर तारुण्यात आहेस, तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूपयौवनसंपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की, ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास?"
54) "किंवा समजा की, रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की, यातनाही भोगत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे; म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले? किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की, ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा?"
55) "किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. हे दारिद्र्यामुळे झालेले नुकसान असते. मात्र रट्ठपाल हा थुल्लकोट्ठित येथील सधन व मुख्य परिवारातील असून त्यांना कोणत्याही प्रकारचा संपत्तीचा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की, ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? आणि रट्ठपाला,नातेसंबंध संपल्यामुळे होणारा तोटा काय असतो? तर एखाद्याला भरपूर नातेवाईक, ओळखी, मित्रमंडळी असतात; व नंतर क्रमाने ते सर्व कमी होत संपून जातात. त्यावेळी त्याला वाटते की, "आता संपत्ती मिळविणे कठीण आहे, व उपयोगही नाही," इ. असा विचार करून तो केस कापून, काशाय वस्त्र लपेटून गृहहीन होतो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की, ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास?"
56) रट्ठपाल उत्तरला, "महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की, ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक् सम्बुद्धांनी सांगितलेली चार तत्त्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती चार तत्त्वे अशी:–
(१) जग अनित्य असून सतत बदलत आहे.
(२) जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही.
(३) आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे.
(४) तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे.
57) "विलक्षण! खरोखरच उत्कृष्ट!" राजा उद्गारला. तथागतांनी सांगितले ते किती बरोबर आहे!"
*************************
खंड दुसरा: भाग तिसरा समाप्त
*************************
Comments
Post a Comment